
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नायगाव व नरसी कडकडीत बंद; सर्वपक्षीय सहभागाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद….
नांदेड प्रतिनिधी
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नायगाव व नरसी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नायगाव व नरसी येथील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने, प्रतिष्ठाने व बाजारपेठ बंद ठेवून महाराष्ट्र बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे, नायगावचा आठवडी बाजार असतानाही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व व्यावसायिक आस्थापने पूर्णपणे बंद ठेवत महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे नायगाव व नरसी येथील मुख्य बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली.
या बंदला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, व्यापारी, युवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा दिला. हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि भविष्याच्या रक्षणासाठी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी नायगाव येथील हेडगेवार चौकात आंदोलकांनी एकत्र येत विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारास जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव पोलीस प्रशासन व महसूल विभागाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
बंद आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावे यासाठी नायगाव येथे पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नरसी चौक येथे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलकांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. पोलीस प्रशासन व आंदोलकांच्या समन्वयामुळे महाराष्ट्र बंद पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार भगवानराव हणमंते (अंचोलीकर), युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे ( घुंगराळेकर ) , जिल्हा सचिव बालाजी गायकवाड, जिल्हा सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, सतीश वाघमारे, मिलिंद बच्छाव, अविनाश गायकवाड, साईनाथ जिगळेकर, युवा उद्योजक कपिल डुमणे, राजू भद्रे, फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर, शेख मैनोद्दीन, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, गवळी युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे रणजीत देशमुख, जरांगे पाटील आंदोलन समन्वयक बाळाजी वाघमारे, बबलू नरसीकर तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर यांनी महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला साथ देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, व्यापारी, नागरिक, पत्रकार बंधू, पोलीस प्रशासन तसेच उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि भविष्याच्या रक्षणासाठी भविष्यातही अशीच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.




